Saturday, March 6, 2010

मोहीम- किल्ले मृगगड

दिनांक १६ जानेवारी - वार शनिवार - ठरलं मोहीम - किल्ले मृगगड.
नववर्षाला (२००९) ला सुरुवात झाली. पहिली मोहीम ठरली मोहीम - किल्ले मृगगड. गड मीच सुचवला आणि सर्वांनी मान्यता दिली. बऱ्याच चाळण्या मारून शेवटी ५ जण उरले. अभिच्या मरीना उर्फ मारिया (!) ने जायचे ठरले. सकाळी ६.०० ला एरंडवणा सोडले. आकुर्डी रेल्वेस्टेशन वर चहा पिऊन, विनोद ला उचलून आम्ही पंचमहाभूते (अभी, राम, विनोद, अमर आणि मी) जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने खोपोलीकडे प्रस्थान केले. खोपोलीहून पाली रस्त्याला लागल्यावर लगेचच सकाळच्या ब्रेकफास्टसाठी (अरे ब्रेकफास्ट सकाळीच करतात. असो.. त्यावर वेगळा पोस्ट नंतर कधीतरी... ) थांबलो. पोहे २० रुपये बाबत विचारले असता मालकाकडून " सध्या महागाई वाढली आहे साहेब!!! " हा सल्ला दानावर दक्षिणा सारखा ब्रेकफास्ट वर फुकट मिळाला.

तेथेच माननीय विनोदराव भोईटे यांचा अखिल (?) गडकरी मंडळातफे श्रीफळ, पुष्पहार आणि हातरुमाल देऊन जाहीर नागरी (?) सत्कार करण्यात आला. (मोलाचे सहकार्य--अमर गायकवाड, मंडळ अमरचे सहर्ष आभारी आहे !!!). थोडक्यात बऱ्याच दिवसांनी मोहिमेवर येण्याची कृपा केल्याबद्दल हा सत्कार होत होता. (हा बाकीच्यांना इशारा आहे.)

हिरवी झाडे, छोटी छोटी गावे मागे टाकत टाकत एका अवघड वळणावर थबकलो. तेथे एक दुचाकीस्वार रस्त्यावर सांडलेल्या ऑईलमूळे घसरून पडला होता. आम्ही तत्परतेने आमच्याकडील प्रथमोपचार पेटी वापरून प्रथमोपचार केले आणि जेथे रस्त्यावर ऑईल सांडले होते तेथे माती टाकून पुढील अपघात टाळण्याचा प्रयत्न केला. सामाजिक बांधिलकी जपल्याची भावना सुखावून गेली.
वळणावळणाचा रस्ता, दुतर्फा हिरवी झाडे, उंबरी, सेमडी, नाणोसे,परळी हि गावे मागे टाकत जांभूळपाडा गाव गाठले (हेच ते जांभूळपाडा गाव जे १९९७-९८ च्या सुमारास प्रचंड पुरात अक्षरशः वाहून गेले होते). जांभूळपाड्याला खोपोली-पाली रस्ता सोडून गाडी भेलीव च्या दिशेने गाडी वळवली. दिशादर्शक पाट्यांचा आभाव आणि कोरे मैलाचे दगड त्रास देत होते. काका , तात्या, बाळ्या, नाम्या ला विचारत विचारत भेलीव गावात पोहोचलो. भेलीव गावात चारचाकी न्यायाची असल्यास नदीपात्रातून न्यावी लागणार हे लक्षात आल्यावर काही अंतर अलीकडेच सावलीत गाडी लावली आणि मोहिमेला सुरवात झाली.

पहिल्या नजरेत गड अगदीच किरकोळ वाटला. आणि हा गड झाल्यावर आणि काय बघायचे याच्या योजना सुरु झाल्या. ( खंर तर गड मनातल्या मनात म्हणत होता वर या तर खंर मग बघू !). गावकऱ्यानी गडाला जायची वाट सांगितली. गावात एक शाळा आहे. एक भवानी मातेचे मंदिर आहे आणि उजव्या बाजूस वस्ती आहे. ७०-८० उंबऱ्यांचे ३००-४०० लोकवस्तीचे भेलीव हे एक टुमदार गाव.

भवानीमातेचा आशीर्वाद घेऊन मंदिराच्या उजव्या बाजूने चढायला सुरुवात केली. रस्ता समजत होता पण अंदाज येत नव्हता. तेवढ्यात 'पांडुरंग' अगदी देवासारखा धावून आला. (पांडुरंग हा भेलीव मधला एक मेंढपाळ जो नंतर आमचा वाटाड्या झाला) पांडुरंगसाठी भेलीवचा किल्ला म्हणजे काही नवीन गोष्ट नव्हती. त्याच्यासाठी तर ते रोजचेच काम होते. तो वाट दाखवायला तयार झाला आणि मुख्यत्वे अभिने सुटकेचा निश्वास टाकला.

पहिल्या टप्प्याची वाट पायवाटेची काहीशी सोपी आणि डोंगराच्या कातळाला समांतर अशी होती. थोडे चढण घेऊन आम्ही एका गुहेपाशी थांबलो. एक माणूस बसून जो शकेल अशी अंधारी गुहा होती ती. अमरची जिज्ञासू वृत्ती त्याला त्या गुहेत घेऊन गेली. मोबाईलच्या मिणमिणत्या प्रकाशात संशोधन करून अमर, अभी आणि विनोद असे तीन वीर परतले. पण हाती काहीच लागले नाही. एक धडा मिळाला. बरोबर कायम एक विजेरी असावी. (पुढील मोहिमेत यावर जरूर अंमल केला जाईल !!!). पुढे एका घळईतून वर चढलो. घळईने थोडी परीक्षा पहिली पण it's OK म्हणत पुढ गेलो. दुसऱ्या मार्गाने तेथे पोहोचलेल्या अमर ने एक good news दिली। काय ? " जोरदार वाराआहे... समोर उंच उभा कातळ आहे... त्यात कोरलेल्या पायऱ्या आहेत... आणि त्या चढून आपल्याला जायचे आहे.... " बास्स॥ झालं... रामसह सर्वांनी मला शिव्या (त्या येथे टाकत नाही ;) ) दिल्या आणि "हाच किल्ला सापडला होता का?" सुनावले। थोडा मीहि बिचकलो. पण परत पांडुरंग धावून आला. पांडुरंगाने तो कातळ कडा अवघ्या ५ मिनिटात सर केला आणि मग थोडा धीर आला. थोडा वेळ राम ला पटवून, राजी करून ती तीन टप्प्यातली कातळ चढाई चढण्यास सुरुवात केली. जवळपास चाळीस एक फुटाच्या त्या कातळात मधेच काही पायऱ्या लुप्त होत होत्या. वारा प्रचंड वेगाने वाहत होता. तरीही सर्वांनी १५ मिनिटात ती कातळ चढाई यशस्वरीत्या पूर्ण केली आणि आजवरच्या किल्लेभ्रमंती मधील सर्वात अवघड चढाई म्हणून प्रशस्तीपत्रकहि देऊन टाकले. तेथे पांडुरंगाचे आभार मानून त्याला निरोप दिला. आमच्याकडची दोन सफरचंद दिल्यावर त्याच्या चेहेऱ्यावरचा आनंद केवळ अवर्णनीय!!!.

किल्ल्याच्या वरच्या भागात बघण्यासारखे फार काही नाही. पाण्याच्या टाक्यांचे काही अवशेष बघायला मिळतात. किल्ल्यावरून चारही दिशांचा परिसर उत्तमरीत्या न्याहाळता येतो. पूर्वेला दूरवर सरसगड दिसतो. मृगगडावरून समोर एक उंच सुळका दिसतो. अजून एक नमूद करण्यासाखी गोष्ट म्हणजे हा किल्ला प्रदूषण विरहित आहे. हि गोष्ट मनाला अत्यंत सुखावून गेली आणि " किल्ला जितका दुर्गम तितका तो स्वछ" या आमच्या प्रमेयाला सिद्धता मिळाली :)

किल्ल्यावर जेवण आणि घटकाभर विश्रांती घेऊन ( अर्थात राम कातळाच्या भीतीने तितकासा जेवला नाही) कातळ उतरायला सुरुवात केली. अमरच्या मार्गदर्शनाखाली रामने उत्तमरीत्या कातळ उतरण पूर्ण केली आणि अभिने तत्परतेने ते क्षण कॅमेरात कैद केले.( उगाच नाही नेत आम्ही त्याला;) ) कातळ उतरल्यावर उजव्या हाताला एक गुहा दिसताच अमरची संशोधक वृत्ती पुन्हा जागी झाली आणि अमर-विनोद-अभि खोदलेल्या पायऱ्यांवरून कसरत करत गुहा बघून आले. उतरताना फारसा काही त्रास झाला नाही आणि ४० मिनिटात भेलीव गाव गाठले. थोडा वेळ असल्याने जवळच असलेल्या घोटावडे धरणावर जाऊ असे रामने सुचवले. ३.३० ला भेलीव ला निरोप देऊन जांभूळपाड्याकडे गाडी वळवली. विचारत विचारत खोपोली-पाली रस्त्यावरील परळी गावापासून ४ किलोमीटर असणाऱ्या घोटावडे धरणापाशी पोहोचलो (एक उत्तम ठिकाण सुचवल्याबद्दल रामचे आभार !!! ) धरणाच्या काठावर बसून समोरील खळाळते पाणी बघून शीण कुठल्या कुठे गेला. धरणाच्या पाण्यावार दगडाच्या खेळाचा एक अंकहि झाला. (आणि त्यात अभि was undisputed WINNER :) )

लवकर अंधार पडायचा विचार करून ५.०० ला परतीच्या प्रवासा लागलो. आणि पुढील मोहिमाचे नियोजन आणि स्वप्नरंजनालाही सुरुवात झाली.

#######################################
हे लक्षात ठेवा !!!
#######################################
१. वाटाड्या बरोबर असू द्या. भेलीव गावात तो नक्की मिळेल.
२. गडावर पाणी नाही. पाण्याचा साठा बरोबर असू द्या.
३. बरोबर विजेरी असणे उत्तम
४. गडावर राहण्यास सोय नाही त्यामुळे हि मोहीम एक दिवसाचीच असावी.
5. आणि येता येता घोटावडे धरणाला नक्की जा !!!

~~~ मोCoool...

V.R.S.(वाळवंटात राहणे सोडणे !!! )

माझा एक मित्र म्हणतोय V.R.S.घेणार
आयटी मधून V.R.S. घेणारा पहिला माणूस होणार...

रोजच्या coding अन testing ला वैतागलोय पुरता
दिवसरात्र अन रात्रंदिवस माझा ऑफिसमध्ये राबता...

project estimation करता करता स्वतःची किंमत ठरवतोय
त्या पलीकडच आयुष्य मात्र सोयीस्कररीत्या विसरतोय...

Project Plan करताना तारखा डोक्यात फिट्ट बसवतोय
जवळच्या मित्राचा वाढदिवस मात्र डोक्यातून निघून जातोय...

आजचा drop , उद्याचा milestone, परवाच Release
रोजच्या late night मूळे हरवली आहे life ची ease...

हरवलेला आनंद पुन्हा मिळवण्या दोन घटका
मारतो कधी कधी मित्र मंडळींबरोबर फेरफटका...

पण हा आनंद जेवणातल्या केवळ sweet dish सारखा
अन उरलेल्या नावडत्या भाजीसमोर मी उभा अभिमान्युसारखा...

मी त्याला टोचलं म्हटलं V.R.S. नंतर काय प्लान
म्हणतो गावाकडं जाईन करून सगळी शस्त्र म्यान...

शेती करीन गावाकडं त्यात नवीन तंत्र आणीन
पण तेथे माझ्या मनाचा खुद्द मीच मालक असीन...

हळूच तो V.R.S.च्या सुंदर स्वप्नात रमतो
मीही तितक्याच तत्परतेने त्याला वर्तमानात आणतो...

वर्तमानाचे भान येताच तो होतो हिरमुसलेला
परंतु तरीही लढण्यासाठी शस्त्रास्त्र घेऊन सज्जलेला
भविष्यातील आनंदकण वेचण्यासाठी आसुसलेला
आणि म्हणूनच V.R.S.च्या मृगजळाकडे पाठ फिरवून सदैव पुढे चाललेला...

~~~ मोCoool...


Tuesday, March 2, 2010

आमचे पाव-शतक आणि रक्तदानाच दशक !!!

मागच्या आठवड्यात आमचे ( येथे 'आमचे' हे आदरथी एकवचन आहे ) पावशतक पूर्ण झाले. ( लोक ढोबळमानाने पन्नाशीनंतर आर्धी लाकडं पोहोचलीत असं म्हणतात.. मी आता चतकोर म्हणतो ;) ) आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा ओलांडल्याचा अनुभव घेतोय. काही लोक वाढदिवसाला दुखः करतात. एक वर्ष कमी झाले म्हणून शोक करतात. खरा तर वाढदिवस हा तुम्हाला दरवर्षी जाणीव करण्यासाठी असतो .. वर्षागणिक वाढलेल्या जबाबदारीची ... येणाऱ्या नवनवीन आव्हानांना तोंड देण्याची क्षमता निर्माण करण्याची...

या वर्षीही नेहमीप्रमाणे रक्तदान करून वाढदिवस साजरा केला. यंदा दहाव्यांदा रक्तदान केलं. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काही देणं लागतो. आणि याच भावनेतून केलेलं रक्तदान एक वेगळाच समाधान देतं. आणि ह्या वेळेचं वैशिष्ट म्हणजे वाढदिवसाची भेट म्हणून पुणेरी अस्मितेचे प्रतिक असलेली 'पुणेरी पगडी' मुरुडकर झेन्डेवाल्यांकडून घेतली.

मागे वळून पाहताना आठवणीचा चित्रपट सरसर डोळ्यासमोरून सरकत जातो.
आजवरच्या आयुष्यातल्या काही ठळक नोंदी. :-

१. बालवाडीत कविता वाचनात मिळवलेले बक्षीस( ते प्रशस्तीपत्रक आजही माझ्या जवळ आहे )
२. बाबांनी माझ्यासाठी सायकलला बसवलेले छोटे सिट
३. दुसरीत असताना दोनशे मुलांसमोर केलेलं १५ ऑगस्ट चा भाषणं
४. चवथीत असताना सहलीकारता नेलेले आणि नंतर हरवलेले ५० रुपये... सहलीला न जाण्याची मिळालेली शिक्षा... आणि त्यातून मिळालेला वस्तू आणि पैसे सांभाळण्याचा आणि त्याची किंमत समजण्याचा धडा...
५. 'नटसम्राट' हे काय आहे हे कळत नसणाऱ्या वयात fancy ड्रेस स्पर्धेत उभा केला "नटसम्राट"
६. बाबांचा विरोध डावलून आईने आणून दिलेली पतंग, मांजा, भिरभिरे आणि दिवाळीच्या दोन दिवसआधी आणून दिलेले फटाके.
७. दहाव्या वाढदिवसाला घेतलेली सायकल
८. कुसुमाग्रजांच्या वाढदिवशी आयोजित बालकवी संमेलनात सदर केलेली कविता
९. एका ओवर मध्ये २२ runs हवे असताना अनपेक्षितरित्या मी केलेली तुफान फटकेबाजी आणि विजयानंतर माझ्या टीमने मला डोक्यावर घेऊन केलेलं जल्लोष
१०. बाराव्या वर्षी रायगड सर केल्याचा थरारक अनुभव.
११. चित्रकलेच्या परीक्षांमुळे चित्रकलेशी आलेला संबंध... एक colourful experience !!!
१२. तेराव्या वर्षी बाबांनी दसऱ्याला गाडीची पूजा करता करता अचानक पहिल्यांदा गाडी चालवायला दिलेली संधी
१३. सलग तीन वेळा आंतरशालेय बालनाट्य स्पर्धेत मिळवलेल वैयक्तिक अभिनयाचे बक्षीस
१४. आठवीत आणि नंतर engineering ला असताना अनुक्रमे प्रशांत दामलेची आणि अशोक सराफ यांची घेतलेली मुलाखत.
१५. नववीत असताना ऐकलेलं जॉर्जे फर्नांडीस यांचे भाषणं
१६. दहावीच्या महत्वाच्या वर्षी माझा आहार, आजार आणि अभ्यास सांभाळणारी आई आणि अडल्यावेळी कायम माझ्या मागे धावणारे अगदी नादुरुस्त सायकल दुरुस्त करून क्लास पर्यंत आणून देणारे बाबा
१७. दहावीला कमी मार्क्स मिळाले म्हणून रडणारा मी आणि एवढे मार्क्स मिळूनही रडणाऱ्या माझ्याकडे आश्चर्याने बघणारे आई बाबा
१८. दहावीच्या सुट्टीत भोंसला मिलिटरी स्कूल मध्ये घालवलेला एक महिना... एक great learning experience आणि आयुष्याकडे बघण्याची मिळालेली दृष्टी
१९ . बारावीची मार्कशीट हातात पडल्यावर chemistry ले ९६ मार्क बघून "ही माझीच मार्कशीट आहे का?" असे विचारणारा मी आणि बारावीच्या यशाबद्दल आख्या सोसायटीमध्ये अभिमानाने मिरवणारी आई आणि खास प्रसंगासाठी सुप्रसिद्ध "पांडे मिठाई"चे पेढे आणायला धावलेले बाबा ...
२०. बारावीनंतरच्या सुट्टीत बाबांच्या व्यवसायाच्या निमित्ताने अनुभवलेले एक नवीन वेगळे काहीसे व्यावहारिक जग
२१. engineering कॉलेजला कायम मार्गदर्शन करणारे ठिगळे सर
२२. first क्लास engineer झाल्यानंतर पदवीदान समारंभात मिळालेली पदवी आणि अभिमानाने काढलेला फोटो
२३. माझ्या नोकरी निमित्त गाव सोडण्याच्या निर्णयाला तात्काळ होकार देणारे आई-बाबा
२४. कात्रज- सिंहगड मोहिमेपूर्वी झालेली बाबासाहेब पुरंदरे यांची संस्मरणीय भेट (बाबासाहेब हे आमचे दैवत आहेत)
२५. कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले काका, काकू, दादा, ताई, वाहिनी आणि सर्व नातेवाईक आणि आजवर मला लाभलेले शाळा , कॉलेज, engineering कॉलेज आणि कंपनीतले मित्र-मैत्रिणी आणि माझं नाशिक आणि आता गेल्या चार वर्षापासून माझे पुणे .....

आता फार हलकं हलकं वाटतंय....

~~~
मोCoool...

स - सचोटी, चि- चिकाटी, न - नम्रता

सर्वांचे श्वास रोखलेले ... हृदयाची धडधड वाढलेली ... everybody was on the edge of their seat . आणि जल्लोष झाला. रवी शास्त्री ओरडला " .. and he gets it... first man on planet to reach 200 in one-day Cricket.. and he is the superman of India, Sachin Ramesh Tendulkar!" खरंच हा दिवस केवळ क्रिकेट विश्वातच नव्हे तर अवघ्या भारतवासीयांच्या हृदयात सुवर्णाक्षराने कोरला जाईल कधीही न पुसून जाण्यासाठी. आमच्या सच्चू ने वनडेत २०० धावा केल्या ... सचिन तू great च आहेस. आजवरच्या तुझ्या कामगिरीसाठी विशेषण अपुरी पडतील किंबहुना " सचिन " हे आता विशेषण म्हणून वापरायला हरकत नाही. नाहीतरी म्हणतातच ना " If you are Sachin fan then raise your hand .. if you are not then raise your STANDARD ... "

तुझी २०० ची इंनिंग म्हणजे केवळ अप्रतिम !!! त्यात दिसली ती एकाग्रता, dedication, fitness, आणि आमचा ९६-९७ सालातला बेधडक, आक्रमक फटके मारणारा सचिन. त्यानंतर match presentation मारलेला straight Drive चा चौकार :) तर अफलातूनच !!! . आता काही कर्मदरिद्री लोक (हे दारिद्य फक्त बुद्धीशी संबंधित आहे)
तुझी Bradman शी तुलना करून कोण सर्वोत्कृष्ट याचे चार्वित्च्रण बसतील . पण आम्ही एवढच सांगू Dont compare Oranges with Leamons . आम्ही Bradman पहिला नाही आम्ही सचिन पहिला. आमच्या साठी आज हाच सर्वोत्कृष्ट !!! आणि आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो कि आम्ही सचिन ला खेळताना बघितला !!!

Sachin We Salute You !!!
तू राह है... और राही भी ....
तू जान है .... और जहान भी .....
तू सच है ........ और सचिन भी !!!!!

~~~ मोCoool...