Tuesday, June 28, 2016

दशकपूर्ती - 'पुणे' कर म्हणून

                                हो.. दहा वर्ष झाली पुण्यात येऊन अर्थात पुणेकर होऊन. असाच जून महिन्याचा शेवटचा आठवडा होता. नोकरीच्या शोधार्थ पुण्यात पाऊल टाकले होते. एक मनाशी पक्कं होतं. पुण्यात यायचं ते खुल्या मनाने. पुण्याला आपलं मानायचं. नाशिकबद्दल नक्क्कीच प्रेम होतं ... आहे. पण म्हणून पुण्यात आल्यावर या शहराबद्दल नकारात्मक भावना नाही ठेवायची हे पक्कं होत. पुणं समजून घ्यायचं.  'पुणे'कर व्हायचं ! कारण शेवटी 'गंगा गये गंगादास!! जमुना गये जमुनादास !!!'

आज दहा वर्ष झाली. आयुष्यातले बरेच महत्त्वाचे टप्पे ( नोकरी, घर, लग्न ) इथेच झाले. पुण्याने आणि पुणेकरांनी सामावून घेतले. खुप जवळचे मित्र लाभले.

वारी पासून सवाई पर्यंत,
                        गुडलक पासून गडभ्रमंती पर्यंत 
                                        आणि मिसळीपासून गणेशोत्सवापर्यंत  !!!
                                                                खूप अनुभवलं इथे...
                                                                                   जिवाभावाचे मैतर लाभले.

                                                      धन्यवाद पुणे !!!


(ता.क.: कुठल्याही गोष्टीचा जाज्वल्य अभिमान बाळगायलाही शिकलोय आता !)  

Saturday, June 11, 2016

एक वारी अशीही ...


                                ठिकाण मु.पो. राख.... तालुका पुरंदर ..... जिल्हा पुणे .... एका पाझर तलावासाठी काम करणारे बेचाळीस हात ... आणि दिवसाच्या शेवटी उभ राहिलेल एक ओबड~धोबड़ दगडी चित्र !! पर्सिस्टंट फाउंडेशनच्या माध्यमातून एक दिवस श्रमदान करण्याची संधी मिळाली आणि एक अनामिक समाधान देऊन गेली . 
                               समविचारी २१ लोक शनिवारची हक्काच्या सुट्टीला 'सुट्टी' देऊन सकाळी सातला हजर होते. मोरयाचा गजर झाला आणि वारीला सुरुवात झाली. आंबेगाव कात्रज कोंढवा मार्गे गाड़ी सासवड रस्त्याला लागली. समविचारी मित्रांची वैचारिक देवाण घेवाण सुरु झाली. प्रत्येकाकडे एक 'स्टोरी' होती आणि एक 'नवकल्पना'. ख़रच या कल्पना प्रत्यक्षात आल्या तर् ... या स्वप्नातून बाहेर यायला रस्त्यावरचा एक खड्डा पुरेसा होता. जेजुरीत चहा पिऊन पंढरपूर रस्ता सोडला आणि राख गावच्या ऱस्त्याला लागलो. 
                                 राख हे पुरंदर तालुक्यतले  दोन हजार लोकांचे दुष्काळी गाव.. प्रत्येक उंबऱ्याशेजारी असलेला भला मोठा पाणी साठवायचा ड्रम डोळ्याला टोचत होते. गेले दोन वर्षातल्या दुष्काळामुळे गावात पाण्याचे अत्यंत दुर्भिक्ष होते. पुण्याहुन दगडूशेठ ट्रस्ट तर्फे दोन टँकर आणि जेजुरी देवस्थानचे दोन टँकर यावर गावचा गाड़ा चालू होता. आधीच नाव राख आणि त्यात टँकरने पाणी पुरवठा त्यामुळे गावाचा अपभ्रंश 'टँकरवाडी'. गावापासून दोनेक किलोमीटर अंतरावर याच गावाला उपयुक्त ठरेल असा बंधारा इतके दिवस पडिक होता. या उन्हाळ्यात या बंधाऱ्याचे रुंदीकरण, गाळ काढणे, झाड़ाझुडपांची साफसफाई,  सपाटिकरण, खोलीकरण, बंधाऱ्याच्या भिंतीची उंची वाढवणे आदि कामे चालू होती. प्राथमिक कामाची माहिती दिल्यावर प्रत्येकजण warmed Up  झाला. 
                                  आम्हाला बंधाऱ्याच्या भिंतीचा एक भाग साफ करून समतल करणे आणि नंतर त्यावर दगडांचा थर टाकणे हे काम होते. निसर्गराजानेही उत्तम संकेत दिले. वातावरण ढगाळ आणि पावसाळी होते. कीबोर्डवर झरझर चालणारे हात श्रमदानातही सफाईदार चालत होते. बारा बारा तास एसीच्या हवेत डोक लढवणारे इथेही तितक्याच् वेगाने काम करत होते. साफसफाईचा पहिला टप्पा संपल्यावर सपाटीकरण सुरु झाले. आमच्यातल्या ग्रामीण पार्श्वभुमीच्या मुलांचा अनुभव कामी आला. त्यांनी कुदळ फावड़ा घेऊन या कामात आघाडी घेतली. सपाटीकरणानंतर मोजणी झाली आणि सीमा रेखा आखल्या गेल्या. चार मानवी साखळ्या करून दगडाची वाहतूक सुरु झाली. एका पाठोपाठ एक कधी हलका कधी अवजड ! याच कामात गावकऱ्यांनीही सहभाग नोंदवला.गावातल्या महिला सरपंच ताईंसुद्धा स्वतः  सहभागी झाल्या. मानवी साखळीचे उत्तम चालू होते. ठराविक काळाने साखळीतला वरचा गट खाली येत  होता आणि खालचा गट वर जात होता. दोन तासाच्या श्रमानंतर 'श्रमपरिहार' तर आवश्यकच होता. बंधाऱ्याच्या पात्रातच जेवणाची पंगत बसली. एवढी अंगमेहनत केल्यावार जेवणाची जी चव लागते नं …. एकदम बेष्ट !!! गावकऱ्यांनी जेवणाची उत्तम सोय केली होती. जेवणानंतर पुन्हा एकवार मानवी साखळी लागली आणि दगड वाहतूक सुरु झाली. म्हणता म्हणता दीड तासात दगडी नक्षी पूर्ण झाली. झालेल्या कामाबरोबर ग्रुप फोटो घेऊन over and out घोषित झाले. काम झाल्यावार सगळ्यांनी ट्रक्टर राईडचा मनमुराद आनंद लुटला. बंधाऱ्यात पाणी भरल्यावर गावाला पुन्हा भेट देणार या बोलीवर … गावकऱ्यांचा निरोप घेऊन आमची गाडी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. 
                                   असं म्हणतात … पाठ टेकल्यावर शांत झोप लागते तो सुखी माणूस… आजच्या दिवसापुरता का होईना त्या सुखी माणसाचा सदरा गवसला होता !!!


ता. क.: वय वर्ष १२ ते वय वर्ष ८५ ही काम करणाऱ्या लोकांची रेंज होती. १२ वर्षाचा चुणचुणीत संस्कार आपला वाटा चोख उचलत होता तर ८५ वर्षाचे आजोबा दगड कसे लावायचे याचे अनुभव सांगून आमचा उत्साह द्विगुणीत करत होते.