Friday, March 29, 2019

संतोषगड

'जीव संतोषणारा' संतोषगड !!!

बऱ्याच दिवसांनी जमून आलेली मोहीम ... किल्ले संतोषगड.
फलटण पासून २० किमी आणि पुण्यापासून १२० किमीवर असलेला संतोषगडाची मोहीम 'यावेळेस' मात्र फत्ते झाली. या वेळेस अशासाठी की, २०१४ साली एस टी च्या कृपेने फलटण बस स्थानकात ताथावडे बस चे दर्शन च दुर्लभ झाले. आणि खाजगी वाहनाचा वापर टाळायचा या नियमामुळे संतोषगडाची मोहीम फलटण चे राम मंदिर, निंबाळकर वाडा पाहून आटोपती घ्यावी लागली.

या वेळेस मात्र स्वतःचे वाहन असल्याने ती अडचण नव्हती. किल्ल्याची प्राथमिक माहिती घेऊन सकाळी ६. १५ ला आंबेगाव, कात्रज कोंढवा रस्त्यामार्गे पुणे सोडलं.  बऱ्याच दिवसांनी जुने 'गडकरी' मित्र एकत्र आल्यानं गप्पांचे विषय फटाफट बदलत होते.  गप्पांचे रूप चर्चासत्रात कधी बदलले कुणालाच कळले  नाही.  आयफोन नामक महागड्या फोनच्या उपयुक्तते (?) पासून ते सध्याच्या राजकीय परिस्थिती पर्यंत चर्चांचे विषय बोपदेव घाटातल्या वळणांसारखे बदलत होते.

सासवड च्या सुप्रसिद्ध अस्मिता वडेवाल्याचा पहिल्या घाण्याचा वडा पाव खाऊन गाडी फलटण च्या दिशेने वळवली. गड जसा नजरेच्या टप्प्यात आला तसं गडावरच्या अवशेषांबद्दल उत्सुकता वाढली. छोटेखानी तर दिसत होता पण तरीही वाढलेले वजन, वाढत ऊन आणि सातत्याचा अभाव यामुळे आम्ही या मोहिमेला 'अगदीच सोप्पा' या श्रेणीत टाकणार नव्हतो.

पहिल्या पायरी ला नमस्कार केला आणि ९. ५७ ला गड चढायला सुरवात केली. ऊन चांगलंच जाणवत होतं. पण बऱ्याच दिवसांनी गडकरी मैतर एकत्र आल्याने चढाई सुसह्य होत होती. गडाच्या पहिल्या टप्प्यात वळ्णावळणाची वाट आणि दर  २० पावलावर सातारा वनविभागाचा फलक ! वाट चुकायची अजिबात शक्यता नाही. पहिल्या टप्प्यातली चढण संपल्यावर एका झाडाखाली एक बाक ठेवलाय. काही क्षण बसून सगळ्या परिसराचा पॅनोरमा घेण्याचा मोह न झाला तरचं नवल !

पुढे एक मोठा पडक्या बुरुज आहे. त्यालाच लागून एक छोटा पडका दरवाजाही. जवळच एक सुंदर कमान दिसली. त्या कमानीतून दिसणारा गावातला रास्ता ... आहाहा ...  एक सुंदर फ्रेम. अगदी... 'ही वाट दूर जाते' टाईप .. जवळच एका झाडावर एका पक्षाने आमच्या कॅमेरा ला सुंदरशी पोझ देऊन कृतकृत्य केले. थोड्या वेळाने पक्षाची भीड चेपली. मग काय.. अगदी प्रॉपर फोटोसेशन झाले !

पुढच्या वळणावर भग्नावस्थेतील मोठा दरवाजा आपल्याला भेटतो.  आणि त्याची भग्नावस्था बघून वाईट वाटतं. दरवाजातील देवड्यांच्या खोल्या मात्र सुस्थितीत आहेत. बरं वाटलं ...

त्याच दरवाजाच्या साक्षीने बऱ्याच दिवसांनी (वर्षांनी) सह्याद्रीला पदस्पर्श करणाऱ्या अमरराजे यांचा मंडळाच्या वतीने मिळेल त्या गोष्टीने (हारतुरे हातरुमाल टोपी )जाहीर (!) सत्कार करण्यात आला. अर्थात मोहिमा पुन्हा सुरु करा हे आश्वासन घेऊन !
त्याचबरोबर प्रथमच मोहिमेला आपल्याबद्दल अभि राजे यांचाही त्याच (!) हारतुऱ्यांनी सत्कार करण्यात आला.

गडाचा घेरा फार मोठा नाही. तटबंदी, बुरुज, धान्यकोठार इ. अवशेष बघितले . पण सगळ्यात आश्चर्य आहे ते म्हणजे इथलं टाक !! चिंचोळी  खाली उतरणारी ८-१० पायऱ्यांची वाट. आणि उतरल्यावर दिसत ते भलं मोठं टाकं.  सध्या हे टाकं  कोरडं आहे. पण त्या काळच्या गडबांधणी नियोजनाचा उत्तम नमुना ! सलाम !!! टाक्याची बांधणी , त्याची उपयुक्तता मनात साठवली आणि पुन्हा वर आलो.

तटबंदीला धरून बुरुज गाठला. बुरुज सुद्धा अस्तित्व दाखवणारा ... बुरुजावरच्या जरी पटक्याला मुजरा केला .. आणि परतीची वाट धरली.

खास लोकाग्रहास्तव फलटण बस स्थानकासमोरील पुरी भाजी साठी थोडी वाट वाकडी केली. एवढ्या भर उन्हात केलेल्या मोहिमेनंतर पुरी भाजीचा फडशा पडणार हे वेगळं सांगायला नकोच !!! त्यावर ताक आणि लस्सीच्या आवर्तनाने जो तृप्तीचा अनुभव मिळाला त्याला तोड नाही. गडभ्रमंती ला 'पुनःश्च ' हरिओम करण्याचे ठरवून पुण्याचा रास्ता धरला.

मार्च महिन्याचे पण मे महिन्याचे वाटणारे ऊन ...  तिशी पार झालेली वय  ... मोहिमांमध्ये पडलेला खंड ... हे असूनही बऱ्याच काळानंतर झालेली मोहीम खऱ्या अर्थाने जीव 'संतोषू'न गेली !!!

No comments:

Post a Comment